देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षिततेबाबत अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध
हातकणंगले ,प्रतिनिधी (विनोद शिंगे ):- देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या डोळ्यांमध्ये तेल घालून अहोरात्र पहारा देत असलेल्या भारतमातेच्या शूर जवानांची सुरक्षा आणि त्यांचं संरक्षण करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे, परंतु या शूर जवानांच्यावर अनेक भ्याड हल्ले होत आहेत आणि यामध्ये अनेक वीर जवान शहीद देखील होत आहेत. हा सरळ सरळ केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आणि निष्क्रियपणा आहे म्हणून या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्कर जाधव व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा.आम. डॉ. सुजित मिणचेकर व मा.आम. उल्हासदादा पाटील, राज्य संघटक चंगेजखान पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, जिल्हाप्रमुख वैभव उघळे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोल्हापूर येथे छत्रपती ताराराणी स्मारकाजवळ केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निषेध नोंदवून केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या.
भारतमातेच्या शूर सैनिकांवर होत असलेल्या या भ्याड हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाच्या संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनास कोल्हापूर शहरप्रमुख रवीकिरण इंगवले, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील, शहरसंघटक हर्षल सुर्वे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका श्रीमती स्मिता सावंत, शहरसंघटिका सौ. प्रतिज्ञा उतुरे, उदय शिंदे, संदिप दबडे, विजय भोसले तसेच इतर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.