Home Breaking News बोर्डाची पुरवणी परीक्षाही गैरप्रकारमुक्तच होणार- राजेश क्षीरसागर

बोर्डाची पुरवणी परीक्षाही गैरप्रकारमुक्तच होणार- राजेश क्षीरसागर

Advertisements

बोर्डाची पुरवणी परीक्षाही गैरप्रकारमुक्तच होणार

Advertisements

विभागीय मंडळाकडून कडक अंमलबजावणीचे निर्देश

२४ जूनपासून परीक्षा, तयारी पूर्ण

 

कोल्हापूर, (प्रतिनिधी):- राज्यात मागील फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षेत कॉपीमुक्तीत आणि निकालात अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थानी असलेल्या कोकण विभागीय मंडळ,रत्नागिरी आणि कोल्हापूर विभागीय मंडळाची २४ जूनपासून सुरू होणाऱ्या पुरवणी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. ही परीक्षा कॉपी विरहित होण्यासाठी विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

जून-जुलै २०२५ ची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा २४ जून ते दि.०८ जुलै या कालावधीत तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी)परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे. सदर परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी २३ जूनपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र स्विकारण्यात येणार आहेत.

मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये.
परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्यमंडळ व विभागीय मंडळ स्तरावरुन समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांनी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करुन हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळ हेल्पलाईन क्र. ०२३१-२६९६१०१, ०२३१-२६९६१०२, ०२३१-२६९६१०३
कोकण विभागीय मंडळ हेल्पलाईन क्र. ०२३५२-२२८४८०, ०२३५२-२३१२५०, ९९२१८२५३३३,
९७६५५३९०४६

कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ स्तरावरील समुपदेशक पुढील प्रमाणे आहेत.
लोखंडे अमर शिवाजी,सातारा
९९२२०१०४१५,
जाधव उमेश बापूराव,सांगली
९८८११४००१५,
चांदणे सुर्यकांत गणपती,कोल्हापूर
७७४१९४१३४४,
शिर्के संदिप दत्ताराम,रत्नागिरी
९५५२०६४६४०,
वारंग भाग्यविधाता भास्कर, सिंधुदुर्ग ९४२३२१३२४०

या परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) हे परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परिरक्षक केंद्रावरुन गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरीता व उत्तरपत्रिका आणण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक (रनर) यांनी जीपीएस प्रणाली सुरु ठेवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपुर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स.१०.३० वाजता व दुपार सत्रात दु.२.३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स.११.०० वाजता तसेच दुपास सत्रात दु.३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिका वितरण करण्यात येईल.

फेब्रु. मार्च २०२५ परीक्षेप्रमाणे या परीक्षेमध्येही कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी विभागीय मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन भरारी पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. जिल्हास्तराववरूनही आवश्यकतेनुसार भरारी पथके नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेस नियमित व वेळेत सोडणेबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळ यांना तसेच परीक्षा केंद्रावर अखंडीत विद्युत पुरवठा ठेवण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
सर्व परिरक्षण केंद्रे व सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पत्राव्दारे विनंती करण्यात आलेली आहे.

गुरुवार दि.१९ जून रोजी कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी व शुक्रवार दि.२० जून रोजी कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर येथे सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व परिरक्षक, परीक्षा केंद्र संचालक, यांची संयुक्त सभा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी नियोजित परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र व ओळखपत्रासह उपस्थित रहावे. पावसाचे दिवस लक्षात घेता आणि आपल्या निवासस्थानापासून परीक्षा केंद्राचे अंतर लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेऊन परीक्षापूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी केले आहे.

दहावीसाठी कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा ९, सांगली ११ व कोल्हापूर जिल्ह्यात १४ अशी ३४ परीक्षा केंद्रे आहेत. बारावी साठी सातारा ६, सांगली ९ व कोल्हापूर १० अशी एकूण २५ केंद्रे आहेत.

कोकण विभागीय मंडळात दहावीसाठी रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग २ अशी सहा केंद्रे आहेत. तर बारावी साठी रत्नागिरी ३, सिंधुदुर्ग २ अशी पाच केंद्रे आहेत.

दहावी परीक्षार्थी संख्या पुढीलप्रमाणे -सातारा ७१४, सांगली ७८४, कोल्हापूर जिल्हा ८०४. कोल्हापूर विभाग एकूण २३०२.
रत्नागिरी १४२, सिंधुदुर्ग ४६. कोकण विभाग एकूण १८८.

बारावी परीक्षार्थी संख्या पुढील प्रमाणे- सातारा १६९९, सांगली १५१४, कोल्हापूर जिल्हा २०५२, कोल्हापूर विभाग एकूण ५२६५.
रत्नागिरी ३३४, सिंधुदुर्ग ६३. कोकण विभाग एकूण ३९७.

“परीक्षेत गैरप्रकार सामील असणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि उत्तेजन देणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. क्षेत्रिय अधिकारी व केंद्रसंचालक यांना याबाबत कडक अंमलबजावणीचे निर्देश दिलेले आहेत.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष,कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ

Advertisements
Advertisements