इचलकरंजीत पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या इनामची निदर्शने
इचलकरंजी,(प्रतिनिधी) :- इचलकरंजी शहरासाठी २०२० साली मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. २७ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर योजना फिजीबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनांद्वारे सुळकुड पाणी योजनेची तात्काळ अंमलबजावणी आणि इचलकरंजी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
नागरिक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकीय हस्तक्षेपामुळे मंजूर योजना थांबवली जात आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.
या निदर्शनांना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने करण्यात आले आहे.