हिंगणगाव माळवाडी येथील स्मशानभूमी जागेसाठी जिल्हाधिकारी यानां निवेदन
कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे):- हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील माळवाडी मधील स्मशानभूमी जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना ग्रामपंचायतीच्या वतीने राहुल रत्नपारखे सामाजिक कार्यकर्ते अविनाश गायकवाड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की मौजे हिंगणगाव येथील वस्तीत वास्तव्यास असलेल्या लोकांची लोकसंख्या ७०० इतकी असून माळभाग लोक वस्ती मूळ गावापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर असून माळभागावरून मूळ गावठाणातील स्मशानभूमी जवळ जवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. या वस्तूस्थितीचा विचार करता माळभागावर वास्तव्यास असणाऱ्या लोकांना उघड्यावर अंत्यविधी करावी लागते आहे व पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. अंत्यविधीसाठी खूप मोठी पायपीट करावी लागते तसेच पावसाळ्यात पुर सदृश्य परिस्थिती असताना मुळ गावठाणातील स्मशानभूमीचा अजिबात वापर होत नाही या सर्व परिस्थितीचा विचार करून मौजे हिंगणगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील गायरान गट नंबर ४२४ मधील पाच गुंठे जागा स्मशानभूमीसाठी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे
राहुल रत्नपारखे, राजु मूजावर अविनाश गायकवाड, उमेश पाटील ,अमर वाघमारे,शितल पाचोरे,संजय कदम,अभिजीत कोळी, मिरसो नायकवडे, संतोष नाडे उपस्थित होते.