Home Breaking News महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रसार माध्यम क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रसार माध्यम क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

Advertisements

महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रसार माध्यम क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

Advertisements

कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचा शुभारंभ; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत

 

कोल्हापूर, दि. २१: महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रसार माध्यम क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी कोल्हापूर पद्धतीने फेटा बांधून पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीला राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष श्री यदु जोशी,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. गणेश मुळे, संचालक किशोर गांगुर्डे, कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके आणि सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, ‘सामान्य नागरिकांची प्रत्येक सकाळ बातमीपासून सुरू होते. वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि सामाजिक माध्यमांतून त्यांना हवे असलेले विषय मिळतात. प्रसारमाध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे महत्त्व मोठे आहे. त्यांच्यासाठी शासनस्तरावर विविध योजना निर्माण करण्याचा निश्चितच विचार केला जाईल.’ त्यांनी बैठकीबरोबरच कोल्हापूरातील विविध ठिकाणांना भेट देण्याचे आवाहनही केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरात राज्यस्तरीय अधिस्वीकृती समितीची बैठक आयोजित केल्याबद्दल माहिती व जनसंपर्क विभागाचे आभार मानले आणि उपस्थितांचे स्वागत केले. बैठकीच्या यशस्वितेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पत्रकारांच्या अधिस्वीकृती सोबतच त्यांच्या हिताच्या व्यापक प्रश्नांवर समितीमधून चर्चा होईल- यदू जोशी

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समिती पत्रकारांच्या अधिस्वीकृती सोबतच त्यांच्या हिताच्या व्यापक प्रश्नांवर आणि अडचणींवरही आता चर्चा करेल, असे समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी सांगितले. यावेळी ते म्हणाले, ‘पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, विविध भूमिका घेत वृत्त, टीका आणि टिप्पणी करून चांगले विषय मांडतात. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या प्रश्नांवर माध्यमांतून चर्चा घडवून आणतात. त्यांच्यासाठी आवश्यक योजना आणि मदत शासनाकडून मिळणे गरजेचे आहे.’ याच अनुषंगाने या बैठकीतून विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षांचा सहभाग घेण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि विभागीय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल यदू जोशी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन उत्तम असून, इतर जिल्ह्यांमध्येही अशाच पद्धतीने व्यवस्था करता येईल.’ त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभारही मानले.

बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी संचालक डॉ. गणेश मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यांनी स्वागत कार्यक्रम आणि व्यवस्थापनाबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि विभागीय माहिती कार्यालयाचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक विभागीय माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले.

 

Advertisements
Advertisements