शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन ;
शिवसेनेच्या महाराष्ट्र घडविण्याच्या वारीत सामील व्हा-
किरण सोनावणे
“शिवसेना” ही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासातील एक सोनेरी पान आहे. एका स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत, पत्रकार आणि प्रबोधनकार पित्याने आपल्या पुत्राच्या माध्यमातून पाहिलेलं उज्ज्वल महाराष्ट्राच स्वप्न म्हणजे शिवसेना
शिवसेनेची स्थापना जरी १९ जून १९६६ साली झाली असली तरी त्याची पाया भरणी ही संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाली. महाराष्ट्र पुत्रावर होत असलेला अन्याय आणि सापत्न व्यवहार ठळकपणे समोर आला. मुंबईतील उद्योगपती हे मुंबई आपल्या बापाची आणि वेगळे असे स्वतंत्र राष्ट्र असल्याच्या अविर्भावात वावरत. कारण सत्ताधारी राजकारणी, वृत्तपत्र आणि आघाडीचे नेते आणि पक्ष हे उद्योगपतीच्या आशीर्वादावर चालत होते. त्यामुळे महाराष्ट्रापासून मुंबई गुजरातला द्यायची किंवा मुंबई स्वतंत्र केंद्र शासित राज्य म्हणून ठेवायची हा घाट केंद्रातील नेहरू सरकारने घातला होता. त्याला महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील या मराठी नेत्यांचा तर मोरारजी देसाई या गुजराती धर्जिण्या नेत्याचा पाठींबा होता. यशवंतराव चव्हाण यांनी तर स्पष्टपणे नेहरू यांच्या मताला पाठींबा देऊन काँग्रेसमधील ज्यांना संयुक्त महाराष्ट्र हवा होता, त्यांची अडचण आणि तोंडं बंद करून टाकली होती.
मात्र आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड अमृत डांगे, एस एम. जोशी, शाहीर अमर शेख, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, शाहीर आत्माराम गव्हाणकर अशी वेगवेगळ्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेत असणारे नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत एकत्रित आले . जनतेच्या या लढ्यापुढे सरकारला झूकाव लागलं. पंडित नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी आणि त्यांचे पती फिरोज गांधी यांनी लोकमानस ओळखलं आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान नेहरू यांना राजी केलं. भारताच्या नकाशावर “महाराष्ट्र राज्य” उदयास आले. महाराष्ट्र पुत्रांचा विजय झाला, मात्र या आंदोलनात मोरारजी देसाई यांनी आंदोलन दडपून टाकण्यासाठी जो पोलिसी बळाचा वापर केला. त्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले. रक्ताचा अभिषेक करून महाराष्ट्र पुत्रानी हा महाराष्ट्र मिळवला.
महाराष्ट्र राज्य उदयास आले, मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मात्र मुंबई महाराष्ट्रात असली तरी महाराष्ट्राचे प्रतिबिंब मुंबई मध्ये नव्हतं. मराठी माणूस इथे उपऱ्या सारखं चाकरमानी म्हणून जगत होता. “मुंबई तुमची आणि भांडी घासा आमुची” असे बिगर मराठी आणि परप्रांतीय खाजगीमध्ये मराठी माणसाला हिणवत होता. उद्योगपती पासून ते सावकार आणि गुंड देखील परप्रांतीय होते.
त्याकाळात शिवसेनाप्रमुख फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी दैनिकात व्यंग चित्र रेखाटण्याचे काम करत होते. मात्र आपले स्वतःचे असे व्यंग चित्राला वाहिलेलं साप्ताहिक असावे असं बाळासाहेब ठाकरे यांना वाटू लागले. त्याकाळात “शंकर्स विकली” तसेच डेव्हीड बलो (Blo) यांचे इंग्रजीत व्यंग चित्रांना वाहिलेलं साप्ताहिक होतं, डेव्हीड ब्लॉ मधील व्यंगचित्र बाळासाहेबाना फार आवडत.
पण मराठीत असं कुठलं साप्ताहिक नव्हते. शिवाय फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्र रेखाटन करताना बरीच बंधने येत होती. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या बाळासाहेबांनी मराठीत व्यंग चित्रांचे साप्ताहिक काढण्याची कल्पना आपले वडील ज्यांना ते दादा म्हणत असत त्या प्रबोधनकार ठाकरे यांना बोलून दाखवली. प्रबोधनकारांना देखील आनंद झाला. त्यानी लगेचच संमती दिली. त्यावर बाळासाहेबांनी पुन्हा एक प्रश्न केला, दादा, नांव काय द्यायचं? त्यावर लगेचच प्रबोधनकार म्हणाले, ‘मार्मिक’ बाळासाहेबाना पण हे नाव फार आवडलं आणि “मार्मिक” चा जन्म होऊन ते प्रकाशित होणं सुरू झालं. मराठी पत्रकार विश्वातील हे पाहिलं व्यंगचित्र साप्ताहिक.
शिवसेनाप्रमुख यांच्यातील पत्रकार, समाज सेवक आणि महाराष्ट्र स्वाभिमानी नेता मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी, स्वाभिमानासाठी सरकारवर आणि खाजगी उद्योगावर तुटून पडू लागले.
बाळासाहेब मराठी माणसाच्या मनातलं बोलत आणि लिहीत असल्यामुळे अन्यायाने संतापलेला मराठी तरुण बाळासाहेबाच्या भोवती जमू लागला. त्यावेळी प्रबोधनकार एके दिवशी बाळासाहेबाना म्हणाले, हे असं केवळ जागृती आणि लिहिणं कुठं पर्यंत चालायचं? एवढी माणसे दररोज येतं आहेत, एवढ्यावर समाधान मानून नाही चालणार! याला संघटनात्मक आकार द्या. त्यावर बाळासाहेब वडिलांना म्हणाले, हो संघटना काढायची आहे. पण नांव काय द्यायचे ? त्यावर प्रबोधनकार म्हणाले “शिवसेना” छत्रपती शिवाजी महाराजांची सेना. तेव्हा पासून शिवसेनेचा जो झंझावात महाराष्ट्रात सुरू झाला तो आज पर्यंत सुरू आहे आज शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे शिवसेना असं समीकरण गेल्या ५८ वर्षात निर्माण झाले आहे.
शिवसेना प्रमुख यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला हाक दिली, त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पाला मावळ्यानी साथ दिली तशी साथ शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली. महाराष्ट्र आणि देश हिताच्या आड जो येईल त्याच्याशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हात केले. त्यासाठी त्यांनी ना जीवाची पर्वा केली ना सत्तेची पर्वा केली. देशातील आणि बाहेरील दहशतवाद्यांच्या यादीवर पहिल्या क्रमांकावर असलेलं नांव म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा दिल्लीतून चालत असे. त्याला शिवसेनेने छेद देत. महाराष्ट्राच राजकारण महाराष्ट्रात आणलं.
या ५८ वर्षाच्या काळात शिवसेनेने अनेक चढ उतार पाहिले. मात्र त्या प्रत्येक संघर्षातून शिवसेना अधिक उजळून निघाली. शिवसेनेला शह देण्याचे अनेक प्रयत्न झाले. ते सर्व शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत झाले. पहिला प्रयत्न बंडू शिंगरे याने शिवसेनेच्या सुरुवातीलाच केला, त्यानंतर छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यासगळ्यांनी बंडखोरी केली. मात्र ते बंडखोरी नंतर फार उगवले नाहीत. सर्वात मोठा शिवसेनेला धक्का हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा होता, तो केवळ संघटनात्मक धक्का नव्हता, तर कुटुंबाच्या पातळीवर देखील धक्का होता. मात्र हा धक्का देखील शिवसेनेने पाचवला.
शिवसेना पुन्हा महाराष्ट्रात उभी राहिली. मात्र “घर का भेदी लंका ढहाये” या म्हणी प्रमाणे आयुष्यभर जो विचार, तत्वज्ञान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी उराशी बाळगले. त्या विचारांच्या बांधिलकीला सोडून दस्तूर खुद्द शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र, ज्यांच्यावर शिवसेनाप्रमुखांचे जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्या हाती जनता जनार्दनाच्या साक्षीने शिवसेनेची धुरा मोठया विश्वासाने सोपवली ते उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या गळाला लागले. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या अस्मिता आणि स्वाभिमानाला तिलांजली देत काँग्रेस सोबत सत्तेचा घरोबा केला. काँग्रेसने संपूर्ण भारतात यापूर्वी अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनाची भ्रूण हत्या केली आहे. त्यात समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष ही ठळक उदाहरणे आहेत. आपल्याला राज्यात पर्याय उभा राहू द्यायचा नाही आणि उभा राहिला तर त्याचा नेता किंवा पक्ष फोडून आपण गब्बर व्हायचं. हे काँग्रेसच सुरुवातीपासूनचे धोरण. रिपब्लिकन पक्ष असाच आरपीआयचे आमदार आर. डी. भंडारे यांना फोडला. मात्र महाराष्ट्रातील बहुसंख्य शिवसैनिकांना शिवसैनिकांना हे पटलं नव्हतं, पण बोलणार कसं, ज्या शिवसेनाप्रमुखांना बापाच्या जागी नाही तर देवाच्या जागी ठेवलं त्यांची संघटनेच्या विचाराची कत्तल केली. त्यांना शिवसेनाप्रमुखांचे ते उदगार देखील आठवले नाहीत. एकदा जाहीर सभेतून शिवसेनाप्रमुख कडाडले होते, “ज्यादिवशी माझ्यावर काँग्रेस सोबत युती करायची वेळ येईल, त्यावेळी मी पक्ष चालवण्या पेक्षा, माझे दुकान मी बंद करून टाकीन ”
कोरोनाचा काळ कठीण होताच पण शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. पण बोलणार कोण? उद्धवजीना सांगणार कोण ? कारण त्यांच्या भोवती काँग्रेस राष्ट्रवादीने मस्त पैकी पेरणी करून त्यांच्या हातात सत्ता देऊन जाम करून टाकले होते.
कोण कोंडी फोडणार? कुणाला सांगणार की उद्धवजीनी जे केलं ते चुकीचं आहे. त्यांनी औट घटकेच्या सत्तेसाठी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा गळा घोटला. काही नगरसेवक, आमदार बोलत होते ज्यांच्या विरोधात लढून आम्ही निवडून आलो, येत्या निवडणुकीत लोकांना काय सांगायचे, ही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या सोबत सर्व सामान्य मतदारांशी देखील गद्दारी होती!
अशा असंख्य अस्वस्थ व्यक्तिमध्ये एक नांव होतं एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा मुशीत तैयार झालेला एकनिष्ठ अनुयायी. तो हे सर्व बघत होता. सर्वांच्या सोबत बोलत होता, मत जाणून घेत होता. आणि मग ठरलं… सत्ता गेली तरी बेहत्तर, कोण काय म्हणेल त्याची पर्वा करायची नाही, मात्र जगायचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्यासाठी आणि मरायचं देखील त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्यासाठी. मनात प्रचंड काहूर होतं, मात्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाचे स्मरण करत, एकनाथ शिंदे यांनी विचार केला, माझ्याकडे काय होतं? एक साधा रिक्शा चालक त्याला “शिवसेना” या पंचाक्षरी शब्दांचा परीस स्पर्श झाला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद मिळाला. तसे माझ्या आयुष्याच सोनं झालं. मग त्या शिवसेनाप्रमुखांचे विचार हे जपलेच पाहिजे त्यासाठी वाट्टेल ती किमत चुकवावी लागली तरी बेहत्तर, आणि एकनाथ शिंदे साहेबानी महाराष्ट्राच्या राजकारणात गदर (उठाव ) केलं . त्यांनी केलेल्या उठावातून स्पष्ट झाले की शिवसेनेतील ९० टक्के शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाच्या विरोधात आणि नाराज होते . एकनाथ शिंदे साहेबानी पुन्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या बाजूने आणली.
आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर ते देखील आपल्या मुलाने भरवलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा ऐवजी मोठया गर्वाने एका सामान्य शिवसैनिकांनी जपलेल्या त्यांच्या विचारांच्या अस्सल शिवसेनेच्या मेळाव्यात हजेरी लावली असती. ते काही बोलले असते किंवा नाही माहीत नाही, पण त्यांचा हातात रुद्राक्ष असलेला हात उंचावून त्यांनी तमाम शिवसैनिकांना आशीर्वाद नक्की दिले असतील. मात्र आज शिवसेनाप्रमुख शरीराने जरी उपस्थित नसले तरी त्यांच्या विचाराने भारावलेल्या प्रत्येक शिवसैनिकांच्या रूपाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साजरा करीत असलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आशीर्वादाच्या रूपाने उपस्थित असतील.
राजकीय पक्ष अनेक आहेत. मात्र शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नाही. तो इथल्या सर्व सामान्यासाठी झटणारी सामाजिक संघटना प्रथम आहे, त्यानंतर शिवसेना हे कुटुंब आहे, त्याचे कुटुंब प्रमुख हे शिवसेनाप्रमुख असून त्यांनी दाखवलेला मार्ग आणि दिलेला विचार हा शिवसैनिकांची आचारसंहिता आहे.
शिवसेनेबद्दल काँग्रेसी विचारवंतानी अनेक चुकीच्या गोष्टी समाजात पेरून ठेवल्या, त्यापैकी शिवसेना ही जातीयवादी संघटना आहे. ती शाहू-फुले-आंबेडकर विरोधी संघटना आहे. मात्र किती लोकांना माहीत आहे, शिवसेनेने सर्वात प्रथम शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग मुंबई महापालिकेत केला होता? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकर यांची युती होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना आणि मार्मिकमधून बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत येण्यासाठी अनेकदा साद घातली, कविवर्य आणि रिपब्लिकन नेते नामदेव ढसाळ, भाई सांगारे हे शिवसेनाप्रमुखांच्या सोबत होते. त्यानंतर रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत युती केली. रामदास आठवले यांच्या युती मुळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात दलित सवर्ण वाद होते. ते कमी होण्यास प्रचंड मोठी मदत झाली. एकूण काय काँग्रेसी विचारवंत आणि काँग्रेसी पत्रकार यांनी शिवसेनेला बदनाम करून काँग्रेस हित जपण्याचे काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून गरीब, शोषित, बेरोजगार, असा मराठी माणूस शिवसेनेचा केंद्र बिंदू राहिला आहे. त्यामुळे प्रचंड श्रीमंत, जमीनदार, सावकार लोकं शिवसेनेकडे नव्हती, गरीब मराठा, कुणबी, वंजारी, धनगर आणि दलित अशी लोकं शिवसेनेकडे होती. त्यामुळे पानटपरीवर बसणारा, रिक्शा चालवणारा, किराणा दुकान चालवणारे, शिक्षक, भाजीवाले आणि अशा गोरगरीब सर्वसामान्य बहुजन वर्गातील तरुणाना शिवसेनेने नेते केले, नगरसेवक केले, मंत्री आणि मुख्यमंत्री केले.
आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतील साधी प्रवक्त्याची यादी पाहिली तरी १५ प्रवक्त्यात ७ प्रवक्ते हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचार प्रवाहातून आलेले आहेत
त्यामुळे ५९ व्या वर्धापन दिन हा शिवसेनेच्या नव्या, जोरदार घोडदौडीच्या पर्वाची सुरुवात होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा सभा निवडणुकीने विरोधकांचे दात त्यांच्या घशात घातले असून आता शिवसेना नव्या दमाने पुढे जाण्यास सज्ज आहे, तुम्हांला गोर गरिबांची सेवा करायची असेल तर या शिवसेनेच्या वारीत सामील व्हा, तुम्हांला शिवसेनेच्या वारीतील एक वारकारी म्हणून आवाहन करतो, जय महाराष्ट्र.
किरण सोनावणे,
प्रवक्ता, शिवसेना.
संपर्क-९९२२६६६६०७