बेघर निवारा केंद्रातील महिलांनी वटवृक्ष लावून केला वटपौर्णिमा सन साजरा
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्थेच्या वतीने शहरातील बेघरांसाठी दोन महिला व दोन पुरुष निवारे कार्यरत आहे. रस्त्यावरील बेघरांना रेस्क्यू करून त्यांना निवाऱ्यात आणले जाते व त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय केली जाते.लक्ष्मीपुरी व सीबीएस येथील बेघर निवारा केंद्रातील महिलांसाठी यावर्षीही वटपौर्णिमा उत्सव वटवृक्ष लावून साजरा करण्यात आला. यंदा या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे. यावेळी वडाच्या वृक्षाचे पूजन करून त्याचे रोप लावण्यात आले. संस्था अध्यक्ष अनुराधा भोसले बोलताना म्हणाल्या की वडाच्या झाडाचे पूजन करण्यापेक्षा वडाचे झाड लावून त्याचे पूजन करावे. प्रत्येक महिला ने एक जरी झाड लावले तर सर्वत्र स्वच्छ ऑक्सिजन मिळेल व सर्वांच्या आरोग्यासाठी लाभदायक होईल यासाठी येणाऱ्या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने एक झाड लावून पुढच्या वर्षी त्याचे पूजन करावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अनुराधा भोसले म्हणाल्या की विधवांनाही हळदीकुंकवाचा मान सन्मान दिला पाहिजे. यावेळी सुरेखा कांबळे, सविता कांबळे,अर्चना आडी, पुष्पा कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.